नाटकप्रेमी अभिनेता-अमेय वाघ

मम प्रतिनिधी's picture
Upload Image: 

'कवडसे', 'आईचा गोंधळ', 'जोशी की कांबळे', 'डोह', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'अग्निदिव्य' अशा मराठी चित्रपटांतून तर 'इटस ब्रेकिंग न्यूज', 'बिल्लू', 'अर्धांगिनी'’ या हिंदी चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारा अभिनेता म्हणजे अमेय वाघ. केवळ चित्रपटच नाही तर रंगभूमी, निवेदन, अनेक लघुपट आणि माहितीपटांतून त्याने काम केलं आहे. निपुण धर्माधिकारीचं दिग्दर्शन असलेले 'दळण'हे नाटक तर अमेयच्या अभिनयाचा उत्तम नमुना. 'थेस्पो'नाटयमहोत्सवात या नाटकाने बाजी मारली होती. 'उगवते तारे'या सदरानिमित्त अमेयशी हा साधलेला संवाद....

* अभिनयाच्याक्षेत्रात तुला पहिली मिळालेली संधी कोणती? त्या संधीचा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी कसा फायदा झाला?

- मी लहानपणापासूनच शाळेतल्या स्पर्धांतून भाग घेत आलो आहे. शाळेत असताना मी 'पेशवा' आणि 'नंदादीप' या मालिकांतून काम केले होते. त्यामुळे ती माझी सुरूवात होती. या सर्व कामाचा, अनुभवाचा फायदा मला अनेक करंडक स्पर्धांच्या वेळी झालाच; त्याशिवाय मला कॅमेरासमोर काम कसं करायचं तेही लहानपणापासूनच समजायला लागलं होतं. 'प्ले विदीन अ प्ले' हे मी भूमिका केलेलं पहिलं नाटक माझी पहिली संधी म्हणता येईल.

230352_1928699230188_1623426732_2035845_3380637_n.jpg

* तुझे या क्षेत्रातील प्रेरणास्थान कोण आहेत?

- तसं म्हटलं तर निश्चित असं प्रेरणा स्थान कोणी नाही. आणि तसं नसावं ही असं मला वाटतं. कारण प्रत्येकाकडून आपल्याला काहीना काही तरी शिकता येतं आणि त्यातून प्रेरणा सतत मिळत राहाते. मग तो आपला मित्र, एखादं लहान मुलं नाहीतर कोणी तरी ज्येष्ठ असो. त्यांच्यातील चांगले गुण बघून मला करावसं वाटतं ते माझे प्रेरणा स्थान होतात.

* मराठी आणि हिंदी चित्रपट, शॉर्ट फिल्म, नाटकं, निवेदन अशा अनेक क्षेत्रात तू काम केले आहे, यापैकी कुठल्या क्षेत्रात काम करायला आवडेल?

- या सर्वात अधिक नाटकात काम करायला मजा येते. तेथे आपल्या समोर प्रेक्षक असतात. आणि आपण केलेल्या कामाचे कौतुक किंवा टीका सुध्दा आपल्याला लगेचच कळते. आपल्या कामाची पोचपावती आणि कौतुकाची थाप समोर आपल्याला प्रेक्षकांच्या प्रतिक्रियातून मिळत असते. मात्र चित्रपटांचं आणि इतर कामाचं तसं नसतं. अर्थात माध्यमं वेगळी आहेत. त्यामुळे प्रत्येक कामाचं वेगळं वैशिष्टय आहे.
मला नाटक करायला आवडतं. पण म्हणून मी फक्त नाटकातचं काम करेन असे नाही. एक सारखं तेचतेच करायला मला आवडत नाही. कामाला आणि कलेला कलाकाराने मर्यादेत बांधू नये. एकदा नाटक मग शॉर्ट फिल्म, कधी चित्रपट असंच मला आवडतं. म्हणून मी निवेदन, नकलाकारीही करतो. जी संधी चांगली आणि जे काम चांगलं वाटेल ते प्रत्येकाने केले पाहिजे.

* मोठमोठ्या कलाकारांबरोबर तू काम केले आहेस तो तुझा अनुभव कसा होता? त्यातला एखादा आठवणीत राहिलेला किस्सा.

- खरं तर बर्‍याचदा असं होतं की ज्येष्ठ कलाकारांबरोबर काम करताना नव्या कलाकाराला दडपण येतं. पण मला कधी असं वाटलं नाही. मला कधी या गोष्टीचं प्रेशर आलं नाही. उलट मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालं. त्यामुळे मला खूप काही शिकता आले. मला नेहमी त्यांनी सांभाळून घेतलं. 'कवडसे' या चित्रपटात माझे आईवडील नीना कुलकर्णी आणि दिलीप प्रभावळकर होते. एक शॉट असा होता की, दिलीप प्रभावळकर बाहेरून घरात येतात तर मी झोपलेला असतो. ते मला लाथ घालतात आणि पुढे जातात. सीन झाल्यावर त्यांनी मला विचारलं तुला खूप जोरात लागलं नाही ना, मला ते विचारतायेत हे ऎकूनच मी गार झालो. कारण ते किती ज्येष्ठ आणि मी नवखा होतो. तरी त्यांनी माझी विचारपूस केली. हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं.

DSC_7420_1_[1].JPG

* सध्या तू कोणते प्रोजेक्ट करत आहेस?

- आत्ता आम्ही [आसक्त रंगमंचने] 'गेली एकवीस वर्षे' हे नाटक केले होते. या नाटकाला युरोपमधील 'युनिव्हर्सल टिअ‍ॅत्रो' या फेस्टिव्हलमधे सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून पारितोषिक मिळाले. याच रंगमंचाचे 'तिची सतरा प्रकरणे'या नाटकाला 'झी गौरव' साठी नामांकन मिळाले आहे. सध्या 'मानगुटीवर मयसभा' या नवीन नाटकाचे प्रयोग चालू आहेत. तर 'बोकड' नावाचा मराठी चित्रपट मी करत आहे. जास्त लक्ष सध्या नाटकांकडे आहे.

* सध्याच्या रंगभूमीच्या परिस्थितीविषयी तुला काय वाटतं?

- कोण म्हणतं की रंगभूमीची अवस्था वाईट आहे. मला अजिबात असं वाटतं नाही. मी आसक्त रंगमंचच्या नाटकात काम करतो. आमच्या नाटकांना तर खूप गर्दी होते. त्यामुळे मला नाही वाटतं की मी काही चुकीचं पाऊल उचललं आहे. मला उलट नाटकात काम करण्यात आनंद वाटतो.

* विनोदी चित्रपटांकडून कलात्मक, गंभीर विषयांच्या निर्मितीकडे मराठी चित्रपट सृष्टीची वाटचाल सुरू आहे, हा बदल या क्षेत्रातील नव्या पिढीच्या दृष्टीने पूरक आहे का?

- नक्कीच मला हा होत असलेला बदल चांगला वाटतो. सध्या ज्या विषयातून नवनवीन निर्मिती होत आहे मग ते नाटक असो किंवा चित्रपट याची निर्मिती करताना असेच विषय निवडले जात आहेत जे ग्लोबली अपील होतील. त्यामुळे आमच्या सारख्या तरूण पिढीने याच्याकडे पॉझिटिव्ह पध्दतीने बघावे असं मला वाटतं.

-शिल्पा भावे