* हृदयस्पर्शी नात्यांची उत्तम गुंफ़ण असलेला ’समुद्र’ *

samudra pic_0.jpg
मराठी चित्रपटसृष्टीला सद्या चांगले दिवस आले असून मराठीमधे अतिशय वेगळ्या आणि अनोख्या विषयांवर चित्रपट बनविले जात आहेत. विनोदी कथानकांबरोबरच संवेदनशील विषयांवरही भर दिला जातोय. अशाच वेगळ्या पठडीतले चित्रपट दिग्दर्शन करणारे मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहीरे परत एकदा एक वेगळ्या धाटणीचं कथानक असलेला ’समुद्र’ चित्रपट घेऊन येत असून येत्या १७ डिसेंबरला महाराष्ट्रातील विविध शहरांमधे प्रदर्शित केला जाणार आहे.

वेगळ्या विषयांच्या दर्जेदार मांडणीमधे हातखंडा असलेले आणि वेळोवेळी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारे दिग्दर्शक गजेंद्र अहीरे यांनी परत एकदा आपली प्रतिभा सिद्ध करत ’समुद्र’ या चित्रपटाचे उत्तम दिग्दर्शन केले आहे. ’अमोघ सिनेटोन्स’ आणि ’मॅक्सवेल एंटरटेन्मेंट’ या बॅनरखाली शिरीष तलाठी व सुनील पठारे यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती ’पारध’ या चित्रपटाच्या निर्मात्या अनुराधा तलाठी यांनी केलेली आहे.
samudra pic2.jpg
स्वातंत्र्यपूर्व काळात कोकणात घडणा-या कथानकाची अतिशय सुंदर आणि उत्तम मांडणी केलेला हा ’समुद्र’. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा, पटकथा आणि गीते गजेंद्र अहीरे यांनीच लिहीले आहेत. आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या निसर्गरम्य कोकणातील एका गावात ही गुरफ़टलेली क्लासिकल कथा गुंफ़ली गेली आहे. गावातील एक वयस्कर श्रीमंत व्यक्ती म्हणजेच खोत आपली शाररिक भूक भागवण्यासाठी नंदा नावाची एक सुंदर गाणारी तरूण बाई ठेवतो. त्याचा मानलेला मुलगा रघू त्याला रोज रात्री तिच्याकडे घेऊन जातो आणि सतत होणार्या वरवरच्या भेटीत तोही तिच्या प्रेमात पडतो. मात्र, त्याला ती वेळोवेळी नाकारते. अशातच गावात रॅंड हा विदेशी साहेब येणार असतो मग त्याच्या स्वागतासाठी गावात धावपळ सुरू होते. खोत गावात मनोरंजनासाठी एक नाटक मंडळी बोलवितो. त्या नाटकमंडळीचा प्रमुख भार्गव हा नंदाचा प्रियकर असतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वत:ला वाहिलेला भार्गव तिला सोडून गेलेला असतो. खोत, रघू आणि भार्गव या तिघांच्या मधे परवड होणा-या नंदाची ही कथा. प्रेम संबंधाच्या जाळ्यात गुंफ़लेला आणि प्रेमाच्या त्रिकोणाचा हृदयस्पर्शी उलगडा करणारा ’समुद्र’ हा क्लासिकल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांमधे त्याची ऊत्सुकता वाढलेली दिसत आहे.

या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे या चित्रपटासाठी निवडण्यात आलेली स्टारकास्ट. बर्याच दिवसांनी प्रसिद्ध व ज्येष्ठ अभिनेते डॉ.मोहन आगाशे या चित्रपटात दिसणार असून त्यांच्यासाथीला सोनाली कुलकर्णी(नटरंग फ़ेम), सचित पाटील, जयंत सावरकर, आनंद अभ्यंकर, सीमा देशमुख आणि शर्वरी जेमेनीस यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर या चित्रपटाच्या माद्यमातून अमोघ हा नवा चेहरा पदार्पण करतोय. या चित्रपटाला राहूल रानडे यांनी संगीत दिले असून नरेंद्र भिडे यांचे उत्तम पार्श्वसंगीत लाभले आहे. तर मंजूषा पाटील आणि राजेश दातार यांनी यातील गीते गायिले आहेत.