एकूण 'गोळाबेरीज'

एकूण 'गोळाबेरीज'

महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्या लिखाणाचा कॅलिडोस्कोप दाखवणारा चित्रपट 'गोळाबेरीज.' पु.लं.च्या लहानपणापासून त्यांच्यात लिखाणाची एक वेगळी ऊर्जा निर्माण होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या अवती भोवतीची माणसं. विलक्षण निरीक्षण शक्ती आणि भाषेवरील प्रेम व प्रभुत्व, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मातीशी त्यांचं असलेलं नातं ज्यामुळॆ त्यांच्या लिखाणातून या मातीच्या लेकरांच्या कथा उलगडलेल्या दिसतात. मातीच्या लेकरांच्या, पाळीव प्राण्यांच्या, आपण राहत असलेल्या निसर्गाच्या स्वभावांच्या छटा पु.लं.नी जशा कल्पकतेने मांडल्या तशाच क्षितीज झारापकर यांनी या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर उभं करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.
पु.लं.चं लिखाण त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या घटना चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न चित्रपटात केला आहे. उदाहरणार्थ लहानपणी त्यांना गोष्टी सांगणारे हरीतात्या, शाळेतील दामले मास्तर, कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांचे असलेले मित्र-मैत्रिणी यांच्या गप्पा यातून पु.लं.च्या असंख्य पुस्तकातील संदर्भ या चित्रपटात येतात. सुनीता देशपांडेंशी आयुष्यभराची बांधली गेलेली लग्नाची गाठ. त्यांच्या संबंधांचे संदर्भ हळुवारपणे पडद्यावर दाखवले आहेत. कोकणाचा जावई म्हटल्यावर अंतुबर्वा, हेगिष्टे, नारायण, सासुरवाडीची माणसं अशी अनेक पात्र या चित्रपटात येतात. प्रेक्षकांचे मनोरंजन आणि त्यातून नव्या पिढीपर्यंत पु.लं.चं लिखाण आणि व्यक्तिमत्त्व पोहोचवण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. या चित्रपटामुळॆ रावसाहेब, पेस्तनजी, घर बांधणारा कुलकर्णी, नंदा ह्या व्यक्तिरेखा पुढच्या अनेक पिढ्यांना लक्षात राहतील.
या चित्रपटातील गीतांमुळे संगीतकार पु.लं. ही लोकांना पुन्हा एकदा उमगले आहेत.'इंद्रायणी काठी...' या गाण्यातून पं.भीमसेन जोशींचे व्यक्तिमत्त्व गाण्याच्या आर्त भावांतून समोर येते.‘इथेच टाका तंबू..’या गाण्याला नव्या ढंगात सादर करण्याचा प्रयत्न यात केला गेला आहे.‘जाळीमंदी पिकली करवंद...’या लावणीमुळे चित्रपटाला एक वेगळा रंग चढल्यासारखा वाटतो. पण या दोन गाण्यांची लांबी उगाच वाढल्यासारखी वाटते. त्यामुळे कथानकाची गती काही क्षण मंदावल्यासारखी वाटते. डॉ. देवदत्त कपाडिया यांच्या डिफरन्ट स्ट्रोक्स कम्युनिकेशन प्रा.लि. निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखन क्षितीज झारापकर यांनी उत्तम केले आहे. पु.ल.ची भूमिका साकारणारा निखिल रत्नपारखी आणि सुनीताबाईंची भूमिका साकारणारी पु.ल.ची नात डॉ. नेहा देशपांडे कामत यांचा अभिनय पाहून पु.ल. आणि त्यांच्या पत्नीमधील संवादांचे स्वरूप कसे असतील याची झलक आपल्याला दिसते. दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, सतीश शहा, प्रशांत दामले, संजय नार्वेकर, सुबोध भावे, अविनाश नारकर, मुक्ता बर्वे, भार्गवी चिरमुले, प्रसाद ओक, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, मनोज जोशी, सतीश पुळॆकर, हेमांगी कवी, क्षितीज झारापकर,शरद पोंक्षे अशा प्रसिध्द अभिनेते आणि कलाकारांचा सहभाग असलेला हा चित्रपट पुलं प्रेमींसाठी पर्वणी आहे.